समर्थ कॅम्पस मध्ये महात्मा गांधी जयंती संपन्न
Event Description
समर्थ कॅम्पस मध्ये महात्मा गांधी जयंती संपन्न.
सत्य,अहिंसा,शांतता व सद्भावना हीच यशाची चतूसूत्री -प्रा.राजीव सावंत
समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करण्यात आली.यावेळी एम बी ए चे प्राचार्य राजीव सावंत,बी सी एस चे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप,पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले,फार्मसीचे प्राचार्य डॉ.वैभव आहेर,डॉ.संतोष घुले,आय टी आय चे प्राचार्य पांडुरंग हाडवळे,अभियांत्रिकी चे प्रा.प्रदीप गाडेकर आदी उपस्थित होते.
सत्य व अहिंसा या गांधीजींच्या तत्वाचा प्रचार आणि प्रसार विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थी दशेत करायला हवा तसेच सत्य,अहिंसा,शांतता व सद्भावना हीच यशाची चतुसूत्री असल्याचे मत प्राचार्य राजीव सावंत यांनी व्यक्त केले.
डॉ.वैभव आहेर यांनी गांधीजींच्या जीवनचारित्रावर प्रकाश टाकला.भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील ते प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते.अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले.गांधीजी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते.त्यांनी गरिबी निर्मूलन,आर्थिक स्वावलंबन,स्त्रियांचे समान हक्क,सर्व-धर्म-समभाव,अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली.
प्रा.अनिल कपिले म्हणाले की ‘जय जवान जय किसन’ असा नारा देणारे भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या सर्व महत्त्वाच्या कार्यक्रम आणि चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता आणि परिणामी त्यांना अनेकदा तुरूंगात रहावे लागले. त्यांनी दिलेल्या जय जवान-जय किसान या नाऱ्यामुळे भारतातील लोकांचे मनोबल वाढले आणि संपूर्ण देश एक झाला.थोरामोठ्यांच्या जयंती आणि पुण्यतिथी साजरी करतांना त्यांच्या आयुष्यातील एक जरी गुण अंगिकारले तरी पूर्ण जीवन सफल व यशस्वी होण्यास मदत होईल असे प्राचार्य अनिल कपिले यांनी सांगितले.
आभार डॉ.संतोष घुले यांनी मानले.